Pune | Fri, 31 July 2026

No Ad Available

‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सदिच्छा भेट

Admin | 6 views
‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सदिच्छा भेट

पुणे, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आषाढी वारीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला आज इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छा भेट दिली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान त्यांनी डिजिटल चित्ररथातील विविध आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली.

यावेळी श्री.शेलार आणि श्री.भरणे यांनी राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल सादरीकरणाची पाहणी केली. तसेच चित्ररथामध्ये उपलब्ध असलेल्या एआय आधारित चॅटबॉट प्रश्नमंजूषेचा अनुभव घेत शासनाच्या विविध योजनांबाबत प्रश्न विचारले. वारकऱ्यांना सोप्या आणि आकर्षक पद्धतीने माहिती देणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पारंपरिक वारीसोबत आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘संवाद वारी’ ही नागरिकांशी प्रभावी संवाद साधणारी संकल्पना असून, डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या योजना अधिक सुलभ, आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे मंत्री श्री.शेलार यांनी सांगितले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही वारीसारख्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेला हा डिजिटल चित्ररथ अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना त्वरित आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी असा उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित वारकरी, भाविक आणि नागरिकांनी डिजिटल माहिती, दृश्यफिती तसेच एआय चॅटबॉटच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा ‘संवाद वारी’ हा डिजिटल चित्ररथ आषाढी वारी मार्गावरील विविध ठिकाणी वारकरी, भाविक आणि नागरिकांना शासनाच्या लोकाभिमुख योजना, विकासकामे आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती आधुनिक तंत्रज्ञान आणि लोककलेच्या समन्वयातून प्रभावीपणे उपलब्ध करून देत आहे.


ताज्या बातम्या

Join WhatsApp