Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Admin | 29 views
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार;  बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात  – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ५ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर,वाशीम – १,६४,५५७ हेक्टर, यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर, धाराशिव – १५०,७५३,बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,अकोला – ४३,८२८ हेक्टर,सोलापूर – ४७,२६६ हेक्टर,हिंगोली – ४०,००० हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.एकूण बाधित जिल्हे नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी,अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

****

संध्या गरवारे/विसंअ/


Join WhatsApp