
मुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्याचा सामूहिक निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याने यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज वरळी डोम येथे ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, समितीच्या अशासकीय सदस्य सपना श्रॉफ, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय तज्ज्ञ, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून भारताला आतून कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. ड्रग्स हे या छुप्या युद्धातील सर्वात धोकादायक शस्त्र असून, त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा समजून लढला पाहिजे.
अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. ड्रग्सची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी स्वतः “ड्रग्सला नाही” असा ठाम निर्धार केल्यास कोणालाही त्यांना व्यसनाच्या आहारी नेता येणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचे डोळे आणि कान असून, व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या व्यक्तींबाबत तसेच ड्रग्सचा व्यापार करणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन केले.
राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना याबाबत पत्र पाठविण्यात येणार असून, ‘ड्रग फ्री कॅम्पस’ आणि ‘ड्रग फ्री स्कूल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास शासन पूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. ड्रग्सविषयी माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल तसेच उपयुक्त माहिती देणाऱ्यांना पुरस्कारही दिले जातील, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वयाच्या २१ ते २२ वर्षांपर्यंत युवक व्यसनांपासून दूर राहिल्यास आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवकांनी व्यसनांना ठाम नकार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, युवा शक्ती ही समाजासाठी विध्वंसक नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची जीवनदायी शक्ती ठरली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने घेतलेली ‘ड्रग फ्री मुंबई’ची शपथ प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीत उतरवावी, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याची शपथ दिली.

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान लोकचळवळ बनवूया – मंत्री मंगलप्रभात लोढा
‘ड्रग फ्री मुंबई’ हे केवळ शासनाचे अभियान नसून समाजाच्या सक्रिय सहभागातून उभी राहणारी व्यापक जनचळवळ असल्याचे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबई पूर्णपणे अमली पदार्थमुक्त होईपर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून, प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचा कट हाणून पाडण्यासाठी शासनाबरोबरच समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगून मंत्री लोढा म्हणाले की, शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि व्यसन प्रतिबंधक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाने मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
केंद्र व राज्य शासन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून, येत्या १५ ऑगस्टपासून ‘सीएम महाधन’ कौशल्य विकास योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक लाख युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
व्यापक जनजागृतीसाठी समुपदेशन यंत्रणा
प्रास्ताविकात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाची माहिती दिली. केंद्र शासनाच्या २०२९ पर्यंत ‘ड्रग फ्री देश’ या उद्दिष्टानुसार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले. मुंबईतील शाळा व महाविद्यालयांमध्ये चार हजारांहून अधिक मार्गदर्शन व समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून, एक हजारांपेक्षा अधिक प्रशिक्षित समुपदेशकांचे जाळे उभारण्यात आले आहे. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी चार हजारांहून अधिक शाळा-महाविद्यालयांतील पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि नागरिक मुख्यमंत्री यांच्या ऑनलाइन संवादात सहभागी झाले होते.
दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानासाठी पाठविलेला संदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वाचून दाखविला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ट्रेनिंग मॅन्युअल फॉर कौन्सेलर्स’ या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
0000
संजय ओरके/विसंअ
