
सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गरजू व वंचित कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना सुरक्षित व सुसज्ज निवासाची सुविधा उपलब्ध होत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत करंजे येथे प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत चार घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मंजूर झालेली सर्व घरकुले पूर्णत्वास गेली असून लाभार्थ्यांना त्यांचा ताबा देण्यात आला. लाभार्थी भूमिहीन असल्यामुळे घरकुलासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके, विठ्ठल वाळके, निर्मला परब व मयुरी शिरसाठ यांनी जमीन बक्षीसपत्राद्वारे उपलब्ध करून दिली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय (पीडीयू) योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी प्रति लाभार्थी ३१ हजार ३०५ रुपये प्रमाणे चार लाभार्थ्यांना एकूण १ लाख २५ हजार २२० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जनमन योजनेतून प्रत्येक घरकुलासाठी २ लाख रुपये अनुदान देण्यात आले असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीपोटी १ लाख ४ हजार ५२० रुपयांचे अनुदानही लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

घरकुलांसोबत सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा तसेच वीज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थी कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुविधा निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच श्रीमती मेस्त्री, ग्रामसेवक ऋतुराज कदम, संबंधित अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
