Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे २० मार्चला भूमिपूजन – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

Admin | 4 views
ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे २० मार्चला भूमिपूजन – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. २३ : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 55 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वर्धापन दिन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचक निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.

ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, 20 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह केला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ यंदाचा 99 वा वर्धापन दिन अधिक व्यापक व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सुशोभीकरणाच्या कामामुळे या ऐतिहासिक स्थळाला नवे वैभव प्राप्त होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. या वर्धापन दिनानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी महाड येथे येत असल्याने भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणे, कार्यक्रमस्थळी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे सुशोभीकरणा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती नागरिकांना दाखविणे, तसेच वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, जनसहभाग वाढविण्यासाठी विशेष उपक्रम, विद्यार्थी व युवकांचा सहभाग, तसेच विभागीय समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऐतिहासिक स्थळाच्या गौरवाला साजेसे, समाजप्रबोधनाचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समता, न्याय आणि मानवी स्वाभिमानाच्या लढ्याचा प्रेरणादायी अध्याय असून या वर्धापन दिनानिमित्त समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश अधिक दृढ करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.

०००

जयश्री कोल्हे/स.सं


Join WhatsApp