Pune | Tue, 03 March 2026

No Ad Available

बॅंकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्यावे — पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Admin | 2 views
बॅंकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्यावे — पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणी, दि. ०२ (जिमाका): बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत, सुलभ आणि पारदर्शकपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे,  असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. तसेच, बँकांनी प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, पात्र लाभार्थ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.  प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करून शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचनांही पालकमंत्री यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र अकुलवार, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील कर्ज वितरण विशेषतः पीक कर्ज, कृषी कर्ज आणि इतर प्राधान्य क्षेत्रातील कर्ज, जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखडा, स्वयंरोजगार योजनांची अंमलबजावणी, महिला बचत गटांना कर्जपुरवठा तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील शेतकरी, लघु उद्योजक आणि सर्व वर्गांना मजबूत आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी प्रशासन आणि बँकिंग क्षेत्र एकत्रितपणे कार्यरत आहे. या बैठकीच्या माध्यमातून केलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यात कर्ज वितरण प्रक्रियेला नवीन गती मिळेल, शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होईल आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील बँकिंग कामकाजाचा आढावा सादर करून कर्जवाटप व उद्दिष्टपूर्तीबाबत माहिती दिली. बैठकीत विविध बँकांच्या कामगिरीचे परीक्षण करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

प्रारंभी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या पिएमईजीपी/ सीमएईजीपी/ विश्वकर्मा योजनेतअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या उद्योजकांना कर्ज मंजूरीपत्रे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

तसेच परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयामध्ये मासेमारी करणारे परवानाधारक मच्छिमार दिवंगत अशोक हरिभाऊ वाकळे यांचा मासेमारी करताना मृत्यु झाला होता. त्यांच्या वारसास प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत अपघात गट विमा योजनेतून 5 लक्ष रुपये विमा थेट डीबीटी द्वारे वितरीत करण्यात आला. याबाबतचे मंजुरीपत्र त्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

उल्लेखनीय कार्य करणारे विविध बॅंक शाखाधिकारी यांचाही पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यामध्ये रमन कुमार सौदागर (बँक ऑफ बडोदा), सुर्यकांत केंद्रे (बँक ऑफ इंडिया), ज्ञानेश्वर दापकर (युनियन बँक ऑफ इंडिया), श्री.वानखेडे (स्टेट बँक ऑफ इंडिया), सुर्यकांत हेडाऊ (महाराष्ट्र ग्रामिण बॅक), रामचंद्र अकुलवार (लिड बँक अधिकारी) यांचा समावेश आहे.

०००


Join WhatsApp