Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची मुलाखत

Admin | 5 views
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची मुलाखत

मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिना’निमित्त विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या विशेष मुलाखतीत समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी सामाजिक न्याय, समता आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. १३, मंगळवार दि. १४, बुधवार दि. १५ आणि गुरुवार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. याशिवाय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी केले आहे.

या मुलाखतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत, तरुणांनी शिक्षण, संघटनशक्ती आणि सकारात्मक सामाजिक सहभागाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांद्वारे वंचित, मागासवर्गीय आणि गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह सुविधा, तसेच परदेशी शिक्षणासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या संधी आणि तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे धोरण, रोजगार, शिक्षण आणि निवासाच्या सुविधा वाढविण्यासाठी आखण्यात येणाऱ्या आगामी योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी, तसेच त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाचे नियोजन यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न कसे केले जात आहेत, याची सविस्तर माहिती ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.

 

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/विसंअ


Join WhatsApp