Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Admin | 5 views
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर, दि. १(जिमाका): महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले.

यावेळी आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उप महापौर अक्षय जरग, श्री. साळे आदी उपस्थित होते .

यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली. समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या.

याप्रसंगी माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाने आपले सादरीकरण केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींनी “जागर संविधानाचा” हे पथनाट्य सादर केले तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते  वह्या वाटप करण्यात आल्या.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, डी.जी. भास्कर यांच्यासह इतर हजारो भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००


Join WhatsApp