
- कोणत्याही परिस्थितीत तपासात त्रुटी राहणार नाहीत
- २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय बैठक
नागपूर, दि. १ : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल इंडस्ट्रीयल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीमध्ये झालेला स्फोट दुर्दैवी आहे. रोजीरोटीसाठी काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगार यात बळी पडले. दुपारी ४ पर्यंत एकूण १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या युनिटमध्ये महिला कामगार अधिक असल्याने यात त्यांची संख्या अधिक आहे. गेलेला जीव परत येणार नाही. मात्र, ज्यांचे जीव गेले आहेत, जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

संबंधित कंपनीने नियमाप्रमाणे आवश्यक असणाऱ्या सर्व रितसर परवानग्या घेतल्या का, योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का याचा कसून तपास केला जात असून कोणालाही यात मोकळे सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या स्फोटाची माहिती समजताच पालकमंत्री बावनकुळे यांनी सकाळी जिल्हा प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे व जखमींवर तातडीने औषधोपचार सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, एनडीआरएफ यांची टीम, वैद्यकीय पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीने ऑरेंजसिटी हॉस्पिटल व इतरत्र उपचारासाठी हलविले. दुपारी त्यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेवून सर्व घटनेची माहिती घेतली. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल त्यांच्यासोबत होते. याचबरोबर खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार राजू पारवे, मनोहरराव कुंभारे, डॉ. राजीव पोतदार, माजी जि. प. अध्यक्ष सुनीता गावंडे, समीर उमप, संदीप सरोदे आदी उपस्थित होते.

या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात का याच्या नियमित तपासण्या संबंधित विभागांनी करायलाच हव्यात. यात ज्यांनी नियमांचे पालन केले नाही अशाविरुध्दही कारवाईचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.

२ मार्चला विभागीय आयुक्त कार्यालयात स्फोटाबाबत उच्चस्तरीय बैठक
झालेली घटना व यात निष्पाप कामगारांचे पडलेले बळी लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यादृष्टीने उच्च पातळीवर दिनांक 2 मार्च रोजी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक बोलाविण्यात आली आहे. तपासातील अनेक तथ्य उद्यापर्यंत समोर येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
०००
