
मुंबई, दि. ५ : श्री क्षेत्र चाेंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा. त्याचप्रमाणे पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील त्यामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यात यावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्मस्थान असल्याने एकावेळी किमान 50 ते 70 हजार भाविकांची यात्रेनिमित्त सोय होऊ शकेल यादृष्टीने नियोजन असावे, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण योग्य प्रकारे करण्यात यावे. पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने नियोजित आराखड्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते करण्यात यावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चोंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्धार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे सभापती प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
०००
जनसंपर्क अधिकारी/विधानभवन
