
केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणींच्या पंखांना नवे बळ दिले आहे. याचेच एक जितेजागते उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खेवरे येथील कु. वेदिका विकास सुरोशी. केवळ पदवीधर असून नोकरीच्या मागे न धावता, आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचा मसाला आणि पापड निर्मितीचा व्यवसाय यशस्वीपणे उभा करून त्यांनी आजच्या तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
वेदिका यांचा प्रवास सोपा नव्हता. शेतीवर आधारित उपजीविका असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या वेदिका यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची ओढ होती. हीच ओढ त्यांना ‘महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे’पर्यंत (RSETI) घेऊन गेली. शासनाच्या उद्योजकता जागरूकता कार्यक्रमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये ‘पापड, लोणचे व मसाला पावडर बनविणे’ या विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला. केवळ १० दिवसांच्या या प्रशिक्षणाने त्यांच्यातील सुप्त उद्योजिकेला जागृत केले. प्रशिक्षणादरम्यान मिळालेले उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे त्यांच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरले.
प्रशिक्षण पूर्ण होताच, वेळ न घालवता वेदिका यांनी स्वतःच्या ५० हजार रुपयांच्या भांडवलातून मसाला ग्राइंडिंग युनिटची स्थापना केली. घरगुती चव आणि उच्च दर्जाची गुणवत्ता या जोरावर अल्पावधीतच त्यांच्या मसाला आणि पापड उत्पादनांनी स्थानिक बाजारपेठेत आपली ओळख निर्माण केली. ग्राहकांचा वाढता विश्वास हीच त्यांच्या व्यवसायाची खरी संपत्ती ठरली. आज या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे १५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळत असून, त्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाल्या आहेत.
वेदिका यांच्या या यशामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत. कधीकाळी मर्यादित उत्पन्नावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब आज त्यांच्या या उद्योगामुळे सावरले आहे. “कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना यशाचा आकार देता येतो,” हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. केवळ स्वतःपुरता मर्यादित विचार न करता, भविष्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार करून इतर ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे उदात्त उद्दिष्ट आहे.
शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेचा योग्य लाभ घेऊन स्वबळावर उभ्या राहिलेल्या वेदिका सुरोशी यांची ही यशकथा आज जिल्ह्यातील अनेक महिलांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
