
मुंबई, दि. १५ : श्रीरामपूर मतदार संघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनाबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली.

बैठकीस आमदार हेमंत ओगले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, जल जीवन मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, तसेच आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक बाबींची पूर्तता विनाविलंब करावी. प्रत्येक स्तरावर समन्वय राखून कामकाज जलदगतीने पार पाडण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा हा लोकजीवनाशी निगडित अत्यंत महत्चाचा विषय असल्याने अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व जनसेवेच्या भावनेतून हे काम पूर्ण करावे. योजना वेळेत पूर्ण होऊन प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवावे. असेही पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी नमूद केले.
बैठकीत ठेकेदारांच्या अडचणी, तांत्रिक बाबी आणि निधीवाटप यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
0000
शैलजा पाटील/ वि.सं.अ
